माझी ब्लॉग सूची

रविवार, ऑगस्ट ११, २०१३



                    बा.भ बोरकरांची कविता:                             संधिप्रकाशात. 
मला सलीलच्या आवाजातील "संधिप्रकाशात" या सिडीमधील बा भ बोरकरांची याच नावाची कवीता अतिशय आवडली. जेंव्हा पहिल्यांदा ऐकली तेंव्हा ती जितकी भावली तेवढीच ती आजही आवडते मला. माझ्या अल्पमतीप्रमाणे मीती इथे मांडायचा प्रयत्न केला आहे. मला भावलेली संधिप्रकाशात ही अशी,
  "आयुष्याची आता झाली उजवण.येतो तो तो क्षण अमृताचा"
वार्धक्याकडे झुकलेल्या पण मनाने तरुण आयुष्य जगलेल्यांची  पैलतीर दिसु लागल्यावरची अवस्था यात वर्णीलेली आहे.
जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब. तुझे प्रतिबिंब लाडेगोडे 
आजवर भरपुर जगुन झाले आहे.आता वाट्याला आलेला प्रत्येक क्षण  हा मिळालेला बोनस आहे हाच भाव त्याच्या प्रत्येक वाक्यात डोकावतो.तो कुठेही त्रासलेला नाही. एक समृध्द आयुष्य जगलेला माणुस आहे.तो आपल्या निरोपाचा क्षणही तितक्याच ग्रेसफुली घेतो हे मला खुपच आशादायी वाटते.ही कवीता ऐकताना मला प्रायोपवेशनाने आपले आयुष्य संपवणार्‍या डॉ. रवी बापटांच्या मातोश्रींची आठवण होते.
आयुष्यात भेटलेला प्रत्येक क्षण तो जगला आहे तरीही तो अलिप्त आहे.

सुखोत्सवे असा जीव अनावर.पिंजर्‍याचे दार उघडावे
आत्तापर्यंत जगलेले आयुष्य आपण भरभरुन जगलो आहोत आता डोळे मिटायला माझी ना नाही.हेच तो सुचवतो आहे.
.  संधीप्रकाशात अजुन जो सोने.तो माझी लोचने मिटो यावी.
अजुन हातपाय चालतात सर्वांना आपण हवेहवेसे वाटतोय  तोवरच देवाने आपल्याला नेले तर बरे असा भाव यातुन डोकावतो. तरीही हा भाव अगतिकतेचा नाही. हे विशेष.

असावीस पास. जसा स्वप्नभास.जीवी कासावीस झाल्याविना.

तो पुर्णत: निर्मोही झालेला नाही.आयुष्य अतिशय उत्कटतेने जगलेला माणुस अरसिक असुच शकत नाही.
त्यालाही त्याची सखी जवळ हवी आहे या निरोपाच्या वेळी.......मग ती स्वप्नवत किंवा त्याला एकट्याला जाणवणारी का असेना........
पण ती पण त्याच्यासारखीच असावी.म्हणुनच तो तीला निरोपाच्या वेळी कासावीस न होता मोकळ्या मनाने निरोप द्यायला सांगतो आहे.
तेंव्हा सखे आण तुळशीचे पान.तुझ्या घरी वाण नाही त्याची.
तुच ओढलेले त्या सवे दे पाणी थोर ना त्याहुनी तिर्थ दुजे.

ती सखी आणी त्याचे प्रेम हे बाजारु नाही.ज्या उत्कटतेने तो तीला तीच्या घरी ताटव्याने फुललेल्या तुळशीची आठवण करुन देतोय त्यावरुन तीची सोज्वळता सामोरी येतेय.काही कारणाने दोन जिवांना लौकिक अर्थाने एकमेकांचे होता आले नाही तरी त्यांच्यात असणार्‍या उत्कट पेमाचे प्रतिबिंब यात दिसते.(हा माझा बालबुध्दीनी लावलेला अर्थ असल्याने त्यात बरेच तोडकेपण असायची शक्यता आहे.कदाचीत ते दोघे एकरुप झालेले पतीपत्नी असतीलही.मग तो सोडुन जात असल्याने त्यांच्या घराला आता तीचे घर असे संबोधत असावा....शेवटी कवीतेचा अस्वाद घेणे महत्वाचे.तिची चिकीत्सा करणे नव्हे...नाही का...)
जाताना त्याला रामनाम नको आहे,गंगाजल नको आहे तर  त्याला त्याच्या सर्वस्वाच्या हातुन शेंदलेल्या  पाण्याचा घोटही पुरेसा आहे.ते त्याला जगातल्या कोणत्याही तिर्थापेक्षा मोठे वाटते.यातच त्याच्या प्रेमावरील श्रध्देचा विजय दिसतो.
वाळल्या ओठा दे निरोपाचे फुल.भुलीतली भुल शेवटली...........

त्याचे प्रेम फक्त शारीर प्रेम नाही. मात्र आता गात्रे थकलीत.तीला निरोप देण्याचा क्षण समोर उभा ठाकला आहे..... एतके दिवस न मिळालेली पण आसपास अस्तित्वाने जाणवणारी त्याची सखी आता कायमची अंतरणार हे दिसते आहे......कधीकाळी तिच्यावर केलेल्या निस्सीम पण अप्राप्य प्रेमाची मनाशी कवटाळुन ठेवलेली ती ऋणानुबंधाची ठेव त्याला परत एकदा अनुभवावी मगच जीव सोडावा असे वाटते आहे. म्हणुनच तर आयुष्यात कधीही काहीही हक्काने न मागणारा तो आज मात्र आपल्या सखीला आपल्या सुकलेल्या ओठावरती........ निरोप द्यायला सांगतोय........
खरच हॅट्स ऑफ़ आहेत माझे त्या कवीला. आणी सलील नी दिलेल्या चालीला. ही कवीता माझा आत आत खोलवर रुतली आहे. दरवेळी ऐकताना ती पाझरतेच डोळ्यांमधुन..........    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: