माझी ब्लॉग सूची

शनिवार, डिसेंबर २५, २०१०

एक्स रे.

एक्‍स रे कशाचा असावा अस मला कुसुमाग्रजांच्‍या प्रेमगीताच्या (प्रेम कुणावर कराव च्या चालीवर  म्‍हणावस वाटायला लागंलय (अर्थातच त्‍यांची क्षमा मागून)
आता कोणी काय दुखतय असं विचारल्यावर "माझ नाक' असे उत्तर  दिल्यावर समोरच्याला ते उद्धटासारखे वाटले नाही तरच नवल.पण
(हे आता सरेगम मधल्या देवकी पंडीतच्या चालीवर) मला नाकाचा एक्स रे काढायला लावल्यामुळे हा प्रश्न उत्पन्न झालाय.
  आता एक्स रे रुम मध्ये गेल्यावर हा बाबा माझ्या नाकाचा एक्स रे कसा काढणार ह्या विवंचनेत असणार्‍या मला त्याने आधी उताणॆ मग पालथे अशा प्रकारात झोपायला लावले.मग मोठ्ठा आ करायला लाउन नाक अन तोंड त्या पृष्टभागाला टेकवायला लावलं.एकाच वेळी डोक्यावरचा लाईट आणी नाकाखाली घुईईईईईई........... असा आवाज यायला लागला.अन मी म्हणजे तो त्या खट्ट्या आम की झेरॉक्स कॉपीतला आंबाच असल्याचा भास झाला. 
 

सोमवार, डिसेंबर २०, २०१०

अभि जाउन आता जवळजवळ पाच महिने झाले. आता ह्यातुन बाहेर पडुन लिहायचे ठरवलेही होते. पण...(हा पण बरेचदा घात करतो नै) काल पहिल्यांदाच एका समारंभाला उपस्थित रहावे लागले. अगदी जवळचे असल्याने गेले. सोबत कन्यका होती. माझी सर्‍हुद माझ्या मनाची पुर्ण काळजी घेत होती. पण इतके गोंजारुन घ्यायची सवय़ नसणारी मी ह्या सगळ्या प्रसंगात जास्तच कानकोंडी झाले. अपंगांना सहानभुती का नको असते याची थोडीफार जाणिवही ह्यातुन झाली.
   निमीत्त होते बारशाचे.त्यामुळे "सवाष्णींची" असणारी लगबगही तिथे अपेक्षीत होती. माझ्या जावेने मला औक्षणासाठी मला बोलावले.दिवे लावतानाही सहभागी करुन घेतले. मात्र घुगर्‍या वाटताना तिच्या बरोबर सर्वांना हळदी कुंकु लावणारी माझ्या शेजारच्या मामीपर्यंत येउन परत गेली. त्यावेळी मी मुलीशी बोलत असल्यासारख्र करुन तीला मी पाहिले नसल्याचे दर्शवले. मात्र आमच्या **** ने तिला परत बोलावताना खुणवताना मी पाहिले.अन ते त्या कुंकु लावणारीनेही पाहिले. आता आली का पंचाईत.
मला त्यांच्यातले संभाषण कळले म्हणुन ती अस्वस्थ.अन तीला काय वाटेल मला कळलेलं बघुन,म्हणुन मी अस्वस्थ.  परत माझासमोर येउन मला कुंकु लावण्याचा तो कार्यक्रम पार पडला . आता आले ना लक्षात मी वर अपंगांचे उदाहरण का दिले ते.आता नुसत्या घुगर्‍या दिल्या असत्या तर काही बिघडले असते का.पण आम्ही कसे तुला " आमच्यातलेच" समजतो हे दाखवण्याच्या प्रयत्नात उरलेल्यांनाही माझ्याविषयी कळले.नाही बाकिच्यांना कळले याबद्द्ल मला आक्षेप नाही पण त्यांचा problem होतो ना एकतर मला सरळ विचारता येत नाही अन त्या हळु म्हणुन जी कुजबुज करतात ती मात्र मला स्पष्ट ऐकायला येत असते हा आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे गेल्या पाच महिन्यातला.
 मी तशी पहिल्यापासुनच  हे सगळॆ मानणारी नाही even अभि असतानाही मंगळसुत्राविषयी आम्ही दोघेही उदासिनच होतो. कारण आमच्या प्रितीविवाहाच्या सुरवातीच्या काळात मला मंगळसुत्र घालण्याइतके पैसेही त्याच्याकडे नव्हते.(आता मात्र तो नसताना हे मंगळसुत्र माझ्या जवळच्या व्यक्तींना मी "तशी" बघायला कशीतरी वाटते म्हणुन घालते. बघताय ना आपण स्वत:साठी कमी अन दुसर्‍यांसाठीच सगळं करतो.)
तर सांगायचा मुद्दा हा की त्यांनी मला अशा पारंपारीक कामात सहभागी करुन घ्यावे अशी माझी अजिबात इच्छा नाही.(ओ कामकंटाळी नाही मी. पण अशा वेळी नक्की काय करायचे तेच मला उमजत नाही.)
वर आमची कन्यका मला म्हणते की त्या तुला बोलावतील का?
मी म्हटले may be बोलावलं, तर जास्त भाव न खाता जायचं. अन नाही बोलावले तर तुमच्या बच्चेकंपनीत हुंदडायला मी. मोकळी.असे माझे साधे गणीत.
माझ्यामुळे शक्यतो कोणाला त्रास होऊ नये ह्या प्रयत्नात असते मी नेहमी. मात्र समोरचा माझ्यामुळॆ अवघडलेला बघुन मला नक्की काय करायचं हेच कळत नाही.त्यामुळे मला com.plex येतो, बाकी काही नाही.

शनिवार, ऑक्टोबर २३, २०१०

आज "तुक्याची आवली" हे मंजुश्री गोखले लिखीत पुस्तक वाचत आहे.वाचताना वारंवार त्यातल्या बर्‍याच गोष्टी वाचताना तुकारामांवरचे पाहिलेले नाटक आठवते. त्यातले तुकारामांचे आवडीशी असलेले संवाद आठवतात. त्यातल्या तुक्याशी मी अभिला रिलेट करते.एकदम तडकाफडकी आमच्यातुन त्याला घेउन जाताना त्या देवाला आमचा जराही विचार आला नसेल का? त्याची गरज असणारे आम्ही पोरके झालो हे त्या देवाला कळले नसेल का? ती तुक्याची आवली मनाने तरी खंबीर होती पण माझ्या सारखीचे काय? आजच्या सुट्टीच्या दिवशीची त्याची कमी मला फार जाणवते आहे. संध्याकाळ घरी काढणे मला तरी अशक्य आहे असे म्हणणारा माझा अभि आता माझी प्रत्येक संध्याकाळ एकटीने काढायला मला एकटं सोडुन गेला. मुलगी हळुहळु मोठी होतेय तीच्या स्वप्नांची चौकट विस्तारते आहे. तीने स्वत:ची समजुत घातली आहे.सकाळी आयस्क़्रीम बघुन तीचे लकाकलेले डोळे मला जगण्याची आशा देउन गेले.माझासाठी नाही तए तिच्यातला ओलावा जपण्यासाठी मला उभे रहायचे आहे.माझी फिरण्याची हौस अभिने खुप भागवली आता लेकीला आवडते तसे मी वागायचे ठरवले आहे.लहानपणापासुन प्रेमाच्या स्पर्शाला आसुसलेली  मी अभिच्या प्रेमात पार न्हाउन गेले.तृप्त झाले ती इंदोरची मंतरलेली तीन वर्षे मी स्वत:ला कायम म्हणत होते की जगी सर्व सुखी असा कोण आहे हा प्रश्न रामदासांनी मला विचारला असता तर मी गर्वाने "मी" असे उत्तर दिले असते.अशी तीन वर्षातली अभिने  भरभरुन दिलेली प्रेमाची शिदोरी मला आयुष्यभर पुरवुन वापरायची आहे. मुलीच्या आयुष्याच्या चौकटीत रंग भरताना माझी ही अभिच्या अस्तित्वाखेरीच असणारी माझी चौकट, माझाबरोबर जपत तीच्या आनंदात मी रममाण व्हायला हवे.  

गुरुवार, सप्टेंबर ३०, २०१०

 आमच्या घराजवळ आप्पा नावाचा एक अंध व्यक्ती रहात असे त्याच्याभोवती नेहमी मुलांचे कोंडाळे जमलेले असायचे.कारण तो गोष्टी इतक्या रंगवुन सांगायचा की
 त्या ऐकताना त्यात हरवुन जायला व्हायचे.
 श्रवण माध्यमातुन सुरु झालेली ही गंगा त्याकाळात आजी बरोबर भजन किर्तनातुन वाढीला लागली.
 मग चित्ररुपी गोष्टी असलेल्या छोट्या छोट्या पुस्तकातुन र ला ट जोडत हळुहळु वाचन सुरु झाले.
 दुकानाच्या पाट्या,बोर्ड यासारख्या वाचनातुन वाचनाचा वेग़ अन शब्दसंग्रह वाढु लागला. चांदोबा,चंपक,ठकठक या सारख्या पुस्तकापासुन सुरु झालेले वाचन
 मग इसापनिती,अकबर बिरबल पासुन ते रामायण महाभारतातल्या निवडक कथा,संतांच्या गोष्टी वगैरे पर्यंत वाढले.
 माझ्या लहानपणी पोस्टाजवळ एक माणुस बसायचा तो दोन वाचलेल्या पुस्तकावर एक पुस्तक द्यायचा.त्याच्याजवळचा बर्‍यापैकी साठा मी वाचुन काढला होता  त्यावेळी.
   कॉलेजला असताना सायंसला असल्यामुळे आम्हाला अभ्यासेतर कलाशाखेची पुस्तके वाचण्याची परवानगी नव्हती.
 मग कॉलेजच्या ग्रंथपालांना लग्गा लावुन मी त्या तीन वर्षात बरीच कलाशाखेला लावलेली विवीध लेखकांची पुस्तके वाचली.
 प्रथम कथा कादंबर्‍या याप्रकारच्या वाचनप्रकाराशी मी जास्त जोडलेली होते.पण लग्नानंतर मात्र नवर्‍याने वेगवेगळी पुस्तके वाचावयास सांगीतली.सुरवातीला या  प्रकारच्या वाचनाला नाखुश असणारी मी हळुहळु वैचारिक वाचनाकडे वळु लागले होते.
  नाशिकच्या सा.वा.ना मध्ये असणारे खाते,अन रवीवारपेठेतले वास्तव्य माझ्या चांगलेच पथ्यावर पडले.दर दिवसाआड ह्या न्यायाने मी त्या दोन वर्षात बरीच  पुस्तके वाचली.
 नवरा पत्रकार असल्याने परिक्षणासाठी आलेली पुस्तकेही वाचनात आली.
 माझ्या एकांगी झुकलेल्या विचारांना समतोलपणे बघायला यातल्याच काही पुस्तकांनी भाग पाडले.आधी पुस्तक हातात आल्यावर झपाटल्यासारखे वाचले जायचे  पण नंतर वैचारिक पुस्तके वाचताना मला माझ्या वाचनातल्या मर्यादा लक्षात यायला लागल्या.विशेषत: अगदी घरातच घडणार्‍या आमच्या नवराबायकोच्या चर्चेतही वादविवादाच्यावेळी नवरा जेंव्हा इतर चार मुद्दे सांगायचा तेंव्हा आपल्या विशिष्ट प्रकारचीच पुस्तके वाचण्याच्या सवयीमुळे आपण एकांगीच विचार करतोय.हे ही जाणवायचे.
 मग जे विषय आपल्याला रुचत नाहीत तरी त्यात त्यांनी काय म्हटलय ते तरी पहावे या विचारातुन न आवडणारे विषय,त्यावरची पुस्तके चाळायची सवय  लागली.अंबरिष मिश्रांचे "गंगेमध्ये गागन वितळले" वाचताना तर खरच माझ्या मनातील एकतर्फी विचारांचे गगनच जणु वितळल्याचे मला भासले.मग गांधीवरच्या काही पुस्तकांच्या वाचनातुन काही विचार बदलतगेले काही पटले काही ठिकाणी थांबुन मागे वळुन बघावे वाटले.काही पटले नाहीत तरी नाण्य़ाच्या दुसर्‍या बाजुचीच न्हवे तर "मिती"चीही जाणीव झाली.
  अगदी आजकाल वाचलेल्या मीरा अन महात्मा वाचतानाही नवीन माहिती उलगडत गेली.
 राजवाड्यांचे विवाहसंस्थेचा इतिहास जेंव्हा चार वर्षांपुर्वी हातात आले तेंव्हा वाचताना ते पटले तर नाहीच पण खुप रागही आला.मात्र आत्ता चार वर्षांनंतर तेच पुस्तक परत वाचताना श्वास मोकळा झाला मनावरचे ओझे उतरल्याची जाणीव झाली.हे असे का व्हावे,मधल्या काळात बरेच वाचले त्यावरुन मतातही बदल होत गेलेला माझा मलाच जाणवला.
   पुजापाठ कर्मकांड ह्यांना आत्यंतिक मानणारी मी आतुन बदलले,बदलत आहे.मग वाचनाने श्रध्दा कमी झाली म्हणावे का?
   नाही. मला वाटते ती डोळस झाली त्यातली व्यर्थता जाणवली अन सगुणात आडकलेले,  मला भावणारे देवत्व  मला निराकारातही भेटु लागले अन त्यापेक्षा जास्तच भावु लागले,शांतवु लागले.
 हे कशाने झाले तर त्या विषयाच्या वाचनाने,माहितीने माझ्या मनातली कोळीष्टके दुर केली.
  शाळॆत असताना अवघड वाटणारा इतिहास अन भुगोल, मीना प्रभुंची भटकंतीची विवीध पुस्तके वाचुन आपला अन जवळचा वाटु लागला.हे वैश्वीक द्यान कोणी दिले तर पुस्तकांनीच.
 शिवाजी राजे अन पेशवाईच्या सनावळ्या पाठ करताना तेंव्हा नाकी नउ यायचे पण आता कुठेही काहीही त्याविषयी वाचले तर लगेच ते आपले वाटु लागते.अहिल्याबाई होळकरांच्या चरित्रवाचनातुन पेशवाईची घोडदौड उत्तरेला कशी झाली ते समजले अन सगळा इतीहास त्या काळ अन व्यक्तींसह
समोर आला.
         वाचनाने मला काय दिले याचा विचार करताना मला त्याने समृध्द केले विचारांनी,भाषेनी.जगण्याची लय मिळवुन दिली एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जायला शिकवले.हे फक्त आपल्या मातृभाषेच्या वाचनाविषयीच नाही तर डॅन ब्राउन वाचताना मिशनरीही कळु लागले त्या धर्माचा उदय कोणत्या मुळ गोष्टींवर आधारित आहे हे ही कळले.
हिंदीतले पसराई,फणीश्वरनाथ रेणु,प्रेमचंद वाचताना त्या भाषेतल्या समृध्दतेचीही जाणीव झाली. मुस्लीम मन का आयना, बॅ.जीना वाचताना त्यांची विचारधारा कळु लागली.त्यामुळॆ कोणत्याही घटनेकडे जास्त तटस्थतेने बघण्याची सवय लागली.
  एखाद्यावरची आंधळी भक्ती करायची सवयही वाचनानेच मोडुन काढली,त्याला देव मानुन निमुटपणे त्याचे अनुयायी होणे आता आवडेनासे झाले.प्रत्येक घटना वाचन तार्किकतेच्या अन व्यवहाराच्या पातळीवर कसोट्यांवर तासुन बघायची सवय वाचनानेच लागली.
   आतातर वाचन हे फक्त पुस्तकी रुपात राहिले नसुन नेटवरच्या असंख्य ब्लॉग, संकेतस्थळांवरही इतके विपुल अन उच्च दर्जाचे साहित्य,चर्चा वाचावयास मिळते की तेही एक प्रगल्भतेकडे नेणारेसशक्त माध्यमच झाले आहे.
(लोकमत मध्ये पुर्वप्रकाशीत.)

  
आज नेहमीप्रमाणे लॅबमध्ये पेशंट येत होते. एक लहानखुरी दिसणारी अतिशय

सुंदर युवती दवाखान्यात आली.नेहमीप्रमाणे आम्ही तिला रिपोर्ट घ्यायला

यायची वेळ सांगीतली.ती म्हणाली "कल आ सकुंगी कि नही पता नही" हा

आमच्यातला संवाद आहे कालचा.ती मुसलमान होती अन आम्ही हिंदु.तीच्या

ह्या वाक्यानंतर आम्ही दोघीही अर्थपुर्ण हसलो. किती छोटा अन साधारण प्रसंग

होता हा पण ह्यातुन सर्वसामान्यांना जाणवणारी दहशत मात्र तीच्या अन

आमच्या बाबतीत मात्र सारखीच होती.माणुस हिंदु असो वा मुसलमान पन तो

सामान्य आहे ना मग तो ह्यात भरडला जातोच.तीला कल क्या होगा पता नही

हे तेवढ्याच मोकळेपणाने आमच्यासमोर व्यक्त करावेसे वाटले ह्यावरुनच

जाणवते की सर्वसामान्य जनतेला हे सगळे नको आहे.तीला शांतता हवी आहे

हे जातीचे अन पक्षाचे राजकारण तीला नको आहे.  

मंगळवार, ऑगस्ट २४, २०१०

भोचकराव वर स्वर्गात.

गेल्या महिनाभरापासुन नारदराव वर अस्वस्थ झालेले.एरव्ही त्यांच्या अस्तित्वाला धोका पोहचण्याचा काही सवालच नव्हता.पण.....
20 तारख़ेला एक घोळ झाला अन चुकुन हा यम एका भोचक पत्रकाराला वर घेउन आला. बर हा पत्रकारही तिथे स्वस्थ बसेल तर तो भोचक कसला. त्याने केला त्याचा भोचकपणा सुरु. अन आता मात्र त्या देवलोकात गडबड उडाली.
काय करत असेल हा तिथे? बर इथे माझी काळजी वगेरे काहीही न करता तिथे गेला. आता तर तिथे डोक्याशी भुणभुण करायला बायक़ो पण नाही.(म्हणजे कोणी एव्हढ्या लवकर ह्याच्या प्रतिभेवर भाळुन मागे लागली नसली म्हणजे मिळवली.) असा हा विनापाश वर गेलेला बाबा, तिथे देवांनाही वेगवेगळे प्रश्न विचारुन नक़्क़ी भंडाउन सोडत असेल.
ज्याच्या अस्तित्वावरुन होणार्‍या वादविवादात जिंकणारा माझा अभि, त्यालाही तु नाहीसच हे ही मान्य करायला लावेल.
देवाने मात्र त्याच्या ह्या कृतीने माझ्यासारखा निष्ठावान भक्त मात्र गमावला हे निश्चित.
देवाने स्वत:चे स्थान घालवले त्या जागी माझ्या अभिचे अधिष्टापन झाले आहे. ह्यापुढे माझ्या देवघरात माझ्या अभिचीच पुजा होइल.
कालांतराने तु त्याला विसरशील असे सगळे म्हणतात. हे कसे शक्य आहे? इतके दिवस ज्याची सगुण भक्ती केली तो आता मानसपुजेत अनुभवायचा आहे.माझ्या लेकीपर्यंत पोहोचवायचा आहे.तो आहे. ठायी ठायी आहे माझ्यात रुजवलेल्या विचारातुन, त्याच्या लिख़ाणातुन,त्याच्या लेकीच्या रुपाने सगुण रुपातल्या अस्तित्वांशातुनही.
त्याला आवडणार्‍या "ना मै धर्मी ना मै अधरमी" ह्या गाण्यातुन अन शंकराचार्‍यांच्या "पुर्णमद पुर्णमिद........मनोबुध्यहंकार चित्तानी नाहं" ह्यातुन तो हेच सांगत गेला. त्याच्या विचांरांनीच मी थोडीतरी सावरु शकले.
आपण प्रेम करतो ते कशावर? ह्या नष्वर देहावर नाही त्यात राहणार्‍या मनावर. लौकीक अर्थाने आमचाही प्रेमविवाह होता. पण विवाहापुर्वीच्या चर्चेतही रंग रुप पैसा ह्या चर्चा कधी झाल्याच नाहीत. आम्ही एकमेकांना म्हणायचोही आपले चर्चेचेच विषय जास्त रंगतात.
माझा नवरा गमावला ह्या दु:खापेक्षा माझा मित्र,सखा अन माझ्या भटकंतीचा पार्टनर गमावला ह्याचे दु:ख जास्त आहे.
रोजच्या भेट्ण्यात संवादाची गरज नव्हतीच."शब्दावाचुन कलले सारे'" अशी अवस्था होती. 
कालेजात मैत्रिणी चिडवायच्याच की तुम्ही अगदी सारखे आहात.
त्या रात्री बहुतेक आत्म्यांचीही अदलाबदल झाली आहे. त्याचे अस्तित्व मला अजुनही आहे असेच वाटते.

रविवार, जून २७, २०१०

आपल्याकडे कसे देशस्थ कोकणस्थ वगेरे भेद आहेत तसेच भेद इकडे निमाडी अन मालवी संस्कृतीतही दिसुन येतात. मला वाटायचे की हे फक्त आपल्यातच आहे कि काय? हे जसे इथल्या संस्कृतीत आहे तसेच बंगाली लोकांमध्येही असे भेद आहेत म्हणे.म्हणजे कुठेही जा माणुस इथुन तिथुन सारखाच.
एखाद्या पोटशाखेतील माणसाचा आलेला अनुभव आपण त्या पुर्ण जमातीला शाखेला लावतो अन त्यावरुन आपले मत  आपण बनवतो हे कितपत योग्य आहे.त्या समुहाची एक जगण्याची विशिष्ठ रित असेलही पण म्हणुन त्या व्यक्तीला नावे ठेवणे गरजेचे आहे काय?
dont hate in plurals. असे मला नेहमी म्हणावेसे वाटते.एखादा माणुस आत्ता असा वागला तरी दरवेळी तो तसाच वागेल ह्याचीही खात्री नाही देता येत तर...
तो तसा वागला ह्याला तात्कालिक परिस्थितीही कारणीभुत असतेच की!
कदाचित तो त्यावेळेला disturb असेल.थकलेला असेल किंवा अन्य काही कारणाने उदास असेल तर त्याच्या ह्या upset मुड मध्ये त्याला पहिल्यांदा बघणारा माणुस हा ना असाच upset minded आहे असे लेबल लाउन गेला तर. ह्यात दोघांचाही दोष नाही,नाण्याच्या दोन बाजु आहेत ह्या प्रत्येकाला आपली बाजु योग्य वाटते. कधितरी तटस्थ राहुन,सकृतदर्शनी निर्णय टाळायला हवा का? एखाद्या विषयी लगेच असा ग्रह करुन घेणे बरोबर नाही ना?

शुक्रवार, जून २५, २०१०

वटपोर्णिमा

काल वटपोर्णिमा झाली,त्या निमीत्ताने वेगवेगळ्या चर्चेला उत आला.ती करावी न करावी सारख्या अनेक विषयांवर सर्वत्र साधकबाधक चर्चा वाचायला मिळाली.
वडाची पुजा नवर्‍याच्या आयु:वृध्दीसाठी असेल असे नाही मला वाटत.सावित्रीचा नवरा त्या पुजेवेळी तिथे जवळच निपचित पडलेला होता.(आपले नवरे वडाला फेर्‍या मारताना असतात का बरोबर?) त्यावेळी वडाच्या डेरेदार सावलीच्या आडोशाने त्याला ताजेतवाने केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.(नाहीतरी वडाच्या झाडापासुन जास्त प्राणवायुचे उत्सर्जन होते असे म्हणतात.)
राहता राहिला प्रश्न की त्या यमाला तिने बरोबर शाब्दिक जंजाळात अडकवले अन मनासारखा वर मिळवला.याचा अर्थ तिचे मार्केटिंग स्किल जबरदस्त असावे.(नाहीतरी आजच्या काळात असे ग्राहकांना बरोबर गळी उतरवणारे लोकच जास्त नफा मिळवतात ना.)मग तुम्ही म्हणाल यात यमाचा फायदा काय,त्याचा काय फायदा नाय पण आपल्याला बी टोपी घालणारा कोणीतरी भेट्ला ह्यावरुन पुढच्या काळात त्याने विचार करुन बोलण्याची काळजी घेण्याचा धडा यातुन मिळवला असावा.
जोक्स अपार्ट पण मुद्दा हा की परंपरा आहे म्हणुन याचे पालन करायचे का नाही?
माझ्या मते त्या प्रथेच्या निमीत्ताने जर पर्यावरणाचा र्‍हास होणे थांबणार असेल तर अशा परंपरा चालु राहिल्या तरी चालेल.पुजेला भविष्यात वड रहावा म्हणुन आसपासची वडाची झाडे जर वाचत असतील तर...(हा घरी वडाची फांदी तोडुन आणुन पुजा करणार्‍यांनी ती न केलेलीच बरी)
पत्रीपुजेच्या निमीत्ताने झाडाची पाने ओरबाडण्यापेक्षा प्रथा बदलुन पत्री साठी लागणार्‍या झाडाचे उपयोग त्या पानाऐवजी देवासमोर उच्चारले तर (तेवढीच माहितीत भर) आजुबाजुला त्या झाडांची लागवड करता आली तर ती करावी म्हणजे येणार्‍या पिढीला त्या झाडांची त्यांच्या गुणवैशिट्यांची माहिती तर होईल.
निर्माल्याचा खतासाठी उपयोग केला तर चांगले खत बनेल.(पण जर हे करणे शक्य नसेल तर देवाला फुलांचे भारेच्या भारे वाहुन नद्या खराब करण्यापेक्षा नुसते हात जोडणे जास्त पुण्यदायक होईल.) 

शुक्रवार, जानेवारी १५, २०१०

प्रसंग एक:सकाळी समोर रहाणारी मुलगी आली होती.कालच हातावर मेंदी काढली होती मी तिच्या, त्या 7-8 वर्षाच्या मुलीला हाताच्या मागेही मेंदी काढुन हवी होती.ती सकाळी आली तेंव्हा मी पोळ्या करत होते. म्हणुन तीला दुपारी बोलावले.ती म्हणाली "दुपारी नाही येणार मी, ग्रहण आहे ना! 3.30 नंतर येइन.आई दुपारी बाहेर जाऊ नको म्हणाली".
प्रसंग दोन :मुलीच्या शाळेत आज परिक्षा होती,12.30 ची शाळा अन 12.20  झालेतरी व्हॅन आली नाही म्हणुन फोन लावला,"आज तो छुट्टी है, आज ग्रहन आ गया ना,आज की परिक्षा 25 को लेंगे."इति व्हॅनवाला.
प्रसंग तीन: मुलीची मैत्रीण  आली होती खेळायला, वय 3.5 .मला म्हणाली," काकु आज मी आंघोळ नाही केली".मी म्हणाले "चालते एखादेदिवस आज थंडी जास्त आहे ना म्हणुन आईने नसेल घातली आंघोळ". ती म्हणाली," नाई बाबा पण आज दुपारीच करणार आहेत आंघोळ आज ग्रहण आहे ना,दुपारी करतात का कधी अंघोळ?" आता काय उत्तर द्यावे या विचारातली मी.(तिची आई सकाळी आठाच्या आत अंघोळ करते त्याशिवाय ती काही काम करत नाही.) ती विचारत होती की,"तुम्ही पण परत आंघोळ करणार का?"
हे दोन तीन  प्रसंग घडतात तोवर टी.व्ही वरचे ग्रहणाचे क्लिपींग बघुन मी पण काळ्या फिल्म मधुन सुर्य बघु लागले.काय मस्त दिसला तो सुर्य. कधी अशी कोर पाहिलीच नव्हती ना सुर्याची. वा फार मस्त वाटले.हे ही छोटे मोठे आनंदाचे कवडसेच.ते पाहुन शेजारच्या घरातल्या मुलीने विचारले की "मी पण बघु का?"मी म्हणाले "बघ की",काळ्या सुर्यचष्म्यातुन माझ्या मुलीला पण दाखवला मी सुर्य ती पण म्हणाली," आज सुर्याबाप्पाचा चंदामामा झालाय" म्हणुन.पण ती बारावी सायंसची ताई आली नाही ती म्हणाली "आई नको म्हणाली". तीच्यामागेच तीची msc फिजिक्स झालेली मावसबहिण उभी होती.तीने तर यावर बघण्याची उत्सुकता सोडाच पण काहीही भाष्यही केले नाही.(फार प्रयत्नाने आत्ताच लग्न जमले आहे तीचे कदाचित त्याच विचारात असेल ती)
नंतर मी झोपले असताना माझ्या मुलीने परत तो चष्मा लावला अन आता सुर्यबाप्पा पुर्ण दिसतोय का ते मी पाहते असे म्हणाली.
इथे मला कोणाला कमी दाखवायचे नाही किंवा माझी मुलगी कशी हुशार हेही सांगायचे नाही पण चार वेगवेगळ्या वयोगटाच्या अन वेगवेगळ्या कुटुंबातील मुली माझ्या समोर आल्या त्यावरुन मनात तयार झालेल्या चित्राला मी शब्दबध्द केले इतकेच. ह्या सगळ्या आपल्यासारख्या सुशिक्षित घरातल्या मुली आहेत मला परंपरा पाळण्याविषयी वा स्वछतेविषय़ीही काही म्हणायचे नाही पण आज आपण एखाद्या गोष्टीचे अंधानुकरण करण्यापेक्षा त्या मुलींनी ह्या ग्रहण बघण्याचा आनंद घेतला असता तर..... 3043 ला परत असे दिसणार आहे म्हणे असे ग्रहण, परत बघण्यासाठी आपण असणे शक्यच नाही तर मग with proper precaution आत्ताचे  हे ग्रहण बघायला काय हरकत!.त्या 3.5 वर्षाच्या चिमुरडीला काय माहित की ग्रहण काय,अन त्या नंतर आंघोळ का करायची? ती हेच वातावरण बघत मोठी झाली तर.....बर त्यापेक्षा मोठ्या अन science backround च्या मुलींचीही ह्याविषय़ीची अनास्था मला जास्तच हलवुन गेली.हे एका मोठ्या इंदोर सारख्या शहरातील दृष्य तर इतर गावात तर.......

गुरुवार, जानेवारी ०७, २०१०

एखादी गोष्ट अकस्मात मिळाली तर किती आनंद होतो नाही!परवा असेच बाहेर गेलो जेवल्यावर फिरायला.नेहमीच्या बागेत जास्तच गार वाटत होतं म्हणुन रामाच्या मंदिराबाहेरच्या पारावर बसायचे ठरवले.तिथे गेल्यावर अभंग ऐकायला आला.थोडे पुढे गेलो तर अमोल बावडेकर गात होता.मी अगदी घरातल्या कपड्यात होते,आत जावे कि बाहेरुनच ऐकावे काही ठरत नव्हतं.तेवढ्यात मध्यंतर झाला अन माझी मैत्रिण आली आतुन बाहेर.म्हणाली चल आत.कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.मग आम्ही दोघी आमच्या मुलींसमवेत आत अगदी समोरच्या गादीवर बसुन अगदी घरगुती मैफिलीसारखा कार्यक्रम पाहिला.आज दवण्यांचा सावर रे आहे.